१५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या मानवी अवकाश मोहिमेची म्हणजेच ‘गगनयान मोहिमे’ची अधिकृत घोषणा केली होती. त्यानुसार आता या मोहिमेची धुरा सांभाळणाऱ्या व्यक्तीचे नावही निश्चित करण्यात आले आहे. विशेष अभिमानाची बाब म्हणजे ही जबाबदारी एका महिला वैज्ञानिकाकडे देण्यात आली आहे. मागील ३० वर्षांपासून इस्रोमध्ये रॉकेट इंजिनीअर म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. व्ही. आर. ललिथंबिका या महिला वैज्ञानिक या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे नैतृत्व करणार आहेत. अंतराळवीरासह अवकाशात उपग्रह पाठवण्याची ही ‘गगनयान मोहीम’ अवकाश तंत्रज्ञान विश्वातील भारतासाठी एक मोठे यश ठरणार आहे.
काय आहे हे गगनयान ? - भारतातून अंतराळवीराला अवकाशात घेऊन जाणारी ‘गगनयान’ ही पहिली मोहीम असेल.
- इस्रो या मोहिमेवर काम करत आहे.
- यासाठी पाच जुलै २०१८ला इस्रोतर्फे पहिली ‘पॅड अबॉर्ट टेस्ट’ करण्यात आली होती.
- श्रीहरिकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटरवरून ही चाचणी करण्यात आली होती.
- या ‘पॅड अबॉर्ट टेस्ट’मध्ये ‘क्रू एस्केप सिस्टिम’ नावाच्या एका प्रणालीच्या तांत्रिक बाबींचे परीक्षण केले जाते.
- अवकाशयानातील अंतराळवीरांच्या केबिनला ‘लॉंच व्हेइकल’पासून सुरक्षितपणे वेगळे करण्याचे काम हे तंत्रज्ञान करते.
- आपत्कालीन स्थितीत या पॅडचा प्रभावीपणे उपयोग होऊ शकतो.
‘गगनयान’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्पात अनेक विषयांचे तज्ज्ञ, विविध संघटना आणि औद्योगिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींचा सहभाग असेल. या मोहिमेत पाठवण्यात येणारे अवकाशयान चार ते पाच टन वजनाचे असून या प्रकल्पासाठी होणारा खर्च साधारण १० हजार कोटींच्या जवळपास असेल. या मोहिमेपूर्वी ‘जीएसएलव्ही – ३’च्या आधारे दोन मोहिमा हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी डॉ. ललिथंबिका लवकरच आपल्या टीमची निवड करतील आणि त्यानंतर मोहिमेची आखणी करण्यात येणार आहे. ही एक अतिशय मोठी जबाबदारी असून डॉ. ललिथंबिका ती पेलण्यास योग्य आणि सक्षम असल्याचे मत इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी व्यक्त केले आहे.
गगनयान मोहिमेमुळे देशाचे विज्ञान व तंत्रज्ञान उच्चतम पातळीला पोहोचेल आणि देशाची प्रतिष्ठा वाढेल असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच या प्रकल्पामुळे येत्या काळात देशात मोठ्या प्रमाणावर रोजगारांची निर्मिती होईल असेही सांगितले जात आहे. येत्या काळात नोकऱ्यांच्या १५ हजार संधी उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारताची ही महत्त्वाकांक्षी मोहीम यशस्वी ठरल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर मानवी अवकाश मोहीम यशस्वी करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल.